शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

 



सीता स्वयंवरातील अवड 'पिनाक'

 

 



 

पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल.  तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं किराणा मालाचं एक मध्यम आकाराचं दुकान होतं. अतिशय प्रामाणिकपणे ते धंदा करत. आपला माल चोख व भेसळमुक्त असावा याकडे त्यांचा कटाक्ष होता.  जास्त फायदा न घेता माफक दरात ते आपल्या दुकानातील माल विकत असत. त्यामुळे त्यांच्या दुकानावर नेहमीच गर्दी असायची.  सहसा उधारी न देणारे काळे शेठ अतिशय अडचणीत असलेल्या व नेहमीच्या ग्राहकाला मात्र यात अपवाद करत.

 

तालुक्यापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर  असलेलं सोनगाव  हे काळे शेठ यांचा मूळ गाव.  तिथेच त्यांचं घर पण होतं व थोडीफार शेतजमीनही.  अर्थात काळे शेठ दुकान पाहत असल्यामुळे शेती पाहण्यास त्यांना वेळच नव्हता व त्यांचे वडील बंधू गोपाळराव हेच ती शेतजमीन कसत. आपल्याकडे असलेल्या एका दुचाकीवरून घर ते दुकान व दुकान ते घर असा रोजचा प्रवास करीत.

 

काळे शेठ निर्व्यसनी होते.  वारकरी होते.  गेल्या २१ वर्षात त्यांची आषाढीची वारी एकदाही चुकली नाही.  मधून मधून  आपला मेहुणा सुधीर नलावडे यांच्या ताब्यात दुकान देऊन ते देवदर्शनालाही सहकुटुंब जात. देवदर्शनाच्या निमित्ताने फिरणं होतंवेगवेगळे प्रदेश पाहून होतात व मनाला विरंगुळही मिळतो म्हणून व काही वेळा काळे शेठ यांची पत्नी रुक्मिणी  बाई यांच्या आग्रहास्तव देखील काळे शेठ प्रवासाला  निघत.

 

डिसेंबर महिना हा तसा थंडीचा व त्यामुळे त्या प्रसन्न वातावरणात दोन-तीन दिवस कुठेतरी बाहेर जाऊन यावं, देवदर्शन करावे असं जसं रुक्मिणीबाईंना वाटलं तसंच काळे शेठना ही वाटल.  त्यांनी तसं रुक्मिणीबाईचा भाऊ सुधीर याला बोलून ही दाखवलं.  दोन-तीन दिवस मी दुकान बघीन असे ज्यावेळी सुधीरने आश्वासन दिल त्यावेळी काळे शेठनी गाणगापूरला जायचं नक्की केलं.  सोनगाव वरून गाणगापूर काही फार लांब नव्हतं.  सहा-सात तासाचाच प्रवास होता. त्यामुळे गाणगापूरला सकाळी निघायचंसंध्याकाळी देवदर्शन करून  रात्री तिथेच मुक्काम करायचा व दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण जेवून परत रात्रीपर्यंत घरी यायचं असा प्लान ठरला व त्याप्रमाणे काळे शेठ यांनी प्रवासासाठी एक महिंद्रा कंपनीची जीप बुक केले केली.

 

तसं देव-दर्शनासाठी प्रवासाला निघताना आपल्या कुटुंबासोबत आणखीन दोन-चार कुटुंबीय किंवा मित्र यांना काळे शेठ नेहमी बरोबर घ्यायचे.  एकतर गाडीत जागा असायची म्हणून म्हणा किंवा आपल्याबरोबर इतरांनाही देवदर्शन घडेल व त्याचे आपल्याला पुण्य मिळेल म्हणून म्हणा, काळे शेठ नेहमीच इतरांचाही विचार करायचे.  पण या पण यावेळी थोडं जास्तच झालं.  दोन गाव सोडून राहणाऱ्या रुक्मिणीबाईची मोठी बहीण सुरेखाताई व त्यांचे पाच जणांचे कुटुंब देखील यावेळी काळे शेठ  बरोबर गाणगापूरला येण्यास तयार झाले.  काळे शेठ, त्यांची पत्नी रुक्मिणीबाई व सरला, विमला या दोन मुली व राजेंद्र हा मोठा मुलगा यासहित सुरेखा ताईंचे पाच जणांचं कुटुंब मिळून दहा माणसं आता प्रवासाला निघणार होती. तशी जीपची क्षमता दहा जणांना घेऊन जाण्याची होतीच. त्यामुळे अगदी सहजपणे हे १० जण देवदर्शन करून अगदी आरामात येऊ शकले असते. 


पण यावेळी काळे शेठ चे दुकान सांभाळणाऱ्या सुधीर च्या पत्नीने  प्रियाताईने देखील अगदी आयत्यावेळी मी पण येते म्हणून सुधीर कडून निरोप पाठवला. आता प्रिया येणार म्हटल्यावर चंदन व अनुप ही सुधीरची दोन्ही मुले येणार हे ओघानेच आलं. प्रिया आणि रुक्मिणीबाई यांचं नातं जरी नणंद भावजयीच होतं तरी त्यांच्यात अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी एवढं सख्य होतं त्यामुळे प्रिया आपल्याबरोबर येते म्हटल्याबरोबर रुक्मिणीबाईंना अतिशय आनंद झाला व त्यांनी ताबडतोब प्रियाला आपल्याबरोबर घ्याच म्हणून काळे शेठ कडे आग्रह धरला. आता प्रवासाला तेरा माणसं निघाली होती.

 

चलाहेही काही फारसे वाईट नव्हते. दोन-चार माणसं वाढली तरी महिंद्राची जीप एक दणकट गाडी होती. त्यामुळे ही तेरा माणसं सुद्धा थोडीशी गर्दी असून का होईना त्यात बसू शकली असती. अडचण झाली असती. पण प्रवास खूप लांबचा नसल्यामुळे व सर्व माणसे सुद्धा जवळच्या नात्यागोत्याची असल्यामुळे प्रवास फारसा असह्य झाला नसता. त्यामुळे कोणीच काही बोलले नाही. 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच घर सोडायचं असं ठरलं व त्याप्रमाणे संपूर्ण प्रवासाची आखणी करण्यात आली. पण रात्री  दहा वाजता अचानक  सोमेश्वरचा फोन आला.  काळे शेठने सोमेश्वरकडून गाडी भाड्याने घेतली होती.  तो त्याचा व्यवसाय होता. सोमेश्वरने जीप गाडी आधी कोणाला तरी भाड्याने प्रवासासाठी दिली होती. ती त्या रात्री परत येण्याची अपेक्षा होती. परंतु ज्याने ती गाडी भाड्याने घेतली होती त्याने अचानक आपला प्रवास एक दिवसांनी वाढवला. त्यामुळे जीप त्या रात्री येणार नव्हती व त्यामुळे जीप दुसऱ्या दिवशी काळे साहेबांसाठी उपलब्ध नव्हती.

 

आता आली का पंचाईत.  आता काय करणार.  प्रवासाला जाण्यासाठी सगळी तयारी झाली होती पण गाडीच नव्हती.  सोमेश्वरने काळे शेठ न सांगितलं की जीप  ऐवजी दुसरी स्कॉर्पिओ गाडी घेऊन जा. तीच केवळ उपलब्ध आहे. प्रवासाला जाण्यासाठी सगळी तयारी झाली होती. लोक उत्साही होते. मुलं खुश होती. अशावेळी आपला प्रवास कॅन्सल करून सर्वांचा हिरमोड करायचा की थोडासा त्रास सहन करून मिळेल त्या गाडीतून प्रवासाला जायचं हा काळे शेठ समोर प्रश्न होता. त्यांनी रुक्मिणीबाईंना विचारलं देखील. रुक्मिणीबाई तर अधिक उत्साही. त्या म्हणाल्या काय फरक पडतो? थोडासा त्रास होईल. मुलांना मांडीवर घेऊ. थोडं सामान कमी घेऊ. बसू कसं तरी. पण प्रवासाला जायचं. आता कॅन्सल नको करू या.

 

काळे शेठ ने आपल्या बायकोच हे म्हणणं मान्य केलं व थोड्या कमी क्षमतेची का असेना गाडी आहे ना? त्यांन निघू. असं ठरवून त्यांनी सोमेश्वरच्या प्रस्तावाला मान्यता दिली. ठरल्याप्रमाणे हि १३ जण म्हणजे ड्रायव्हरसहित १४ जण प्रवासाला निघाली.

 

गाडी खचून भरली होती. ड्रायव्हरच्या बाजूला स्वतः पांडुरंग शेठ, चंदन व अनुप दाटीदाटीने बसले होते. उरलेले १० जण पाठीमागे अगदी एकमेकांना खेटून व गच्च गचडी करून बसले होते.  या १३-१४  जणांचं दोन दिवसाला लागणार सगळं सामान गाडीच्या वर असलेल्या कॅरियरवर नीट बांधून ठेवण्यात आलं होतं आणि अगदी सकाळी सात म्हणजे सातला गाडी प्रवासाला निघाली.

 

दुर्दैवाने चार-साडेचार तासाच्या प्रवासानंतर घाटामध्ये वळण घेत असताना समोरून ओव्हरटेक करून येणाऱ्या एका ट्रकपासून आपला बचाव करण्यासाठी ज्यावेळी ड्रायव्हरने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ओव्हरलोड असलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा ब्रेक लागला नाही. प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने स्टिअरिंग व्हील डावीकडे फिरवल्यामुळे टक्कर टळली पण गाडी रस्ता सोडून बाजूच्या शेतात जाऊन थडकली. गाडीचं खूप नुकसान झालं. कॅरियरवर ठेवलेलं सगळं सामान अस्ताव्यस्त पसरलं. पण सुदैव हे की गाडीचा वेग कमी असल्यामुळे जीवितहानी झाली नाही किंवा फारशी गंभीर दुखापत देखील झाली नाही. परंतु ड्रायव्हर सहित प्रत्येकाला काही ना काही तरी जखम झाली होती.

 

 

सीता आता उपवर झाली होती.  तिचे वडील राजा जनक यांना आता सीतेच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. आपल्या लाडक्या कन्येला सुंदर, शक्तिशाली, पराक्रमी, राजपुत्र वर म्हणून मिळावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती.  आपल्या दरबारात असलेल्या ऋषीमुनींना व पुरोहितांना, पंडितांना त्यांनी याबाबत काय करावे अशी विचारणा करून त्यांचा सल्ला घेतला होता. शेवटी आपल्या सीतेला तिच्या इच्छेनुरूप वर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे असे सर्वानुमते ठरले.

 

राजा जनकाने सीतेचे स्वयंवर करायचे ठरवले पण या स्वयंवरात काय अट ठेवायची याबाबत कित्येक दिवस विचार करूनही राजा जनक कोणत्याही ठोस निर्णयात येत नव्हते.  शेवटी त्यांनी याबाबत सीतेलाच विचारायचं ठरवलं. शेवटी सीताच ती. प्रत्यक्ष भूमातेची कन्या. अतिशय तेजस्वी, सुंदर पण तेवढीच चपळ, बलवान व हुशार.  त्यामुळे तिचं उत्तर किंवा अट देखील तेवढीच महत्त्वाची, एवढंच नव्हे तर कठीण असणार याची राजा जनकाला थोडी कल्पना देखील होती.

 

सीता म्हणाली की मला पृथ्वीतलावावरील सर्वात बलवान पुरुषाशी लग्न करण्याची इच्छा आहे. हा पुरुष बलवान आहे की नाही याची परीक्षा या स्वयंवरात घेतली जाईल. आणि जो पुरुष भगवान शंकराने राजा जनकाला दिलेले 'पिनाक'  धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावेल व त्या प्रत्यांचेच्या ध्वनीने स्वयंवराचा मंडप कंप पावेल अशा पुरुषाशी मी लग्न करीन.

 

झालं. राजा जनकाने सीतेचे स्वयंवर ठरविले. स्वयंवराचा पणही ठरविला व देशोदेशीच्या राजपुत्रांना स्वयंवराला येण्याचे निमंत्रण पाठविले. सीतेच्या सौंदर्याची ख्याती केवळ भारतवर्षात नाही तर आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील पसरली होती. त्यामुळे सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या  सोन्याच्या लंकेचा राजामहापंडित, शिवभक्त, दशानन रावण देखील या स्वयंवरात भाग घेण्यासाठी स्वतः जनकपुरीत पोहोचला.  स्वयंवराला अनेक राज्यातील अनेक राजपुत्र व राजे उपस्थित होते परंतु प्रत्यक्ष स्वयंवराच्या दिवशी अनेक जणांना धनुष्याला प्रत्यंच्या लावण तर सोडाच पण धनुष्य उचलता ही आलं नाही.  यातील कित्येकांना धनुष्य उचलणं तर सोडाच पण जागेवर असलेलं धनुष्य हलवणं पण जमलं नाही.  धनुष्यामध्ये दैवी शक्ती होती. शेवटी शंकराने  जनकाला दिलेलं हे प्रसाद रुपी 'पिनाक' धनुष्य काही सामान्य धनुष्य नव्हतं.  अनेक राजपुत्र हे धनुष्य उचलू शकत नाहीत हे पाहून दशानन रावण तसा खुश झाला व आपल्या ताकदीची पूर्ण कल्पना असलेल्या रावणाला हे धनुष्य उचलणं म्हणजे एकदम सोपं काम वाटलं.  ताठ मानेने, छाती पुढे काढून व आपले रुंद बाहू दाखवत रावणाने ते धनुष्य उचललं जरूर पण त्या धनुष्याचे वजन त्याला पेलता आले नाही व धनुष्यासकट तो खाली उताणा पडला.

 

आपल्या शक्ति पेक्षा आपण ज्यावेळी अधिक कठीण गोष्ट करायला जातो त्यावेळी ती गोष्ट जर काही काळासाठी होत आहे असं जरी दिसत असलं तरी त्यातून अपघात होऊ शकतात हे ना काळे शेठच्या लक्षात आलं ना रावणाच्या.

 

सुरुवातीला धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या रावणाला असं थोडंसं वाटलं होतं की हे धनुष्य खूप जड आहे. कदाचित आपण ते उचलू शकणार नाही. पण असं असूनही तो प्रयत्न करायला गेला. धनुष्य तर उचलल गेलच नाही पण तो पालथा पडला. धनुष्य त्याच्या अंगावर पडलं आणि त्याचा अपमान झाला. काळे शेठना रावणाच्या सीता स्वयंवराची ही गोष्ट माहीत होती. त्यांच्या आईने लहानपणी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. पण या गोष्टीतील बोध सांगण्याची शेवटी ज्यावेळी वेळ आली त्यावेळी काळे शेठ गाढ झोपून गेले होते. त्यामुळे आपल्या कुवतीहून मोठी गोष्ट करणं धोकादायक आहे हा बोध त्यांना मिळाला नव्हता. त्यामुळे केवळ सात -आठ माणसं बसू शकतील अशा स्कॉर्पिओ गाडीमधून १३-१४  माणसं नेण्याचा त्यांचा निर्णय धोकादायक ठरला व त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  सीता स्वयंवरातील अव ज ड 'पिनाक'       पांडुरंग काळे हे सद्गृहस्थ अतिशय धार्मिक व कुटुंबवत्सल.   तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं...